बारा गांवचे पाणी - गांव सातवे - कराड मुंबई बेंगलोर हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा हायवे. सातारा ते कोल्हापूर यांमधे रिकामे पठार लागते. त्या पठारावर कऱ्हाड उर्फ कराड गांव लागतेच. आणि कोकणातून जर कुंभार्ली घाटातून पाटणकडे याल तर हळूहळू सह्याद्रीची कडेकपारी संपून सपाट प्रदेश लागतो. आजूबाजूचे सगळे डोंगर अचानक नाहीसे होतात. काळ्या मातीत डोलणारी हिरवीगार रसरशीत शेते दिसू लागतात आणि मग समजायचे की कराड आले. खरं तर रोडपेक्षा रेल्वेने जर साताऱ्याहून किंवा सांगलीहून कराडला आलात तर निसर्गाची खरी कमाल पहाता पहाता कराड कधी येते ते कळतच नाही. कराडच्या पंचक्रोशीत फक्त दोनच डोंगर दिसतात. एक सदाशिवगड आणि दुसरा आगाशिवा. कृष्णा आणि कोयना या दोन नद्या महाबळेश्वरला उगम पावतात. सुमारे १३० किमी चा वेगवेगळा प्रवास करतात आणि कराडला एकमेकींना भेटतात. ही भेट इतकी वेगळी की अगदी जणू दोन बहिणी समोरासमोरून येऊन घट्ट मिठी मारतात. आणि मग एकत्र झालेले पाणी ९० अंशात वळून पुढे वाहू लागते. त्यामुळे इंग्लिश T आकार तयार होतो. पूर्ण पृथ्वीवर दोन नद्यांचा असा हा एकमेव संगम. त्यामुळे त्याला प्राप्त झाल...